- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ स्वयंरोजगारापुरते मर्यादित न राहता शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या रोजगार क्लस्टरच्या माध्यमातून व्हावे.त्याचबरोबर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या खाण,पोलाद व इतर उद्योगांच्या गरजेनुसार स्थानिक युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम करणे ही प्रशासनाची प्रमुख प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय,महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम)व ज्ञानदीप लोकसंचालित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथे आज,गुरुवारी बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी देसाईगंज उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान,आरमोरी तहसीलदार उषा चौधरी,माविमचे व लोकसंचालित साधन केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की,स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग उभारल्यास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते.या दृष्टीने प्रशासनाने कृषीपूरक व स्थानिक उत्पादनांवर आधारित रोजगार क्लस्टर विकसित करण्याचे नियोजन केले असून,शिंगाडा उत्पादन,चारोळी प्रक्रिया तसेच बारदाना निर्मिती यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.
गडचिरोली हा भात उत्पादनासाठी ओळखला जाणारा जिल्हा असल्याने भाताशी निगडित उद्योगांना मोठी संधी उपलब्ध आहे.याच पार्श्वभूमीवर माविमच्या समन्वयातून बारदाना निर्मिती प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.आरमोरी येथील लोकसंचालित साधन केंद्राने महिलांच्या सक्रिय सहभागातून हा प्रकल्प यशस्वीपणे उभारला असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महिला बचत गट,लोकसंचालित साधन केंद्र आणि माविमच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
या उपक्रमांमुळे महिलांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास सुरुवात झाली असून,प्रकल्पांची उत्पादकता,बाजारपेठेतील मागणी आणि विस्ताराच्या संधींचा अभ्यास करून भविष्यात अशा रोजगार क्लस्टरची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे अधिकाधिक महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात आगामी काळात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे,यासाठी विद्यार्थी व युवक-युवतींसाठी उद्योगाभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यावर प्रशासन विशेष भर देत आहे.स्थानिक युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत रोजगाराच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे,असेही आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले.
कार्यक्रमात माविमच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव मांडले.यावेळी विविध विभागांचे अधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

