उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- दिवाळी अगदी तोंडावर आली आहे.यामुळे सर्व घराघरांमध्ये लगबग सुरू झाली आहे.फराळाची तयारी सुरू झाली असून किराणा साहित्य आणण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करू लागले आहेत.असे असले तरी यंदा मात्र दिवाळीच्या उत्साहाला महागाईची झळ बसली आहे.विशेषतः खुसखुशीत,चमचमीत खमंग फराळाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.मैदा,रवा, साखर,गूळ,पोहे,तेल,खोबरे,बेसन यासह तूप या सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांची गोची होत आहे.ऐन सणासुदीत वाढत्या महागाईने डोके वर काढले.तथापि,दिवाळी सारखा सण असल्याने त्यांना प्राप्त परिस्थितीत कसातरी सण साजरा करावा लागेल. दरवर्षी दिवाळी आली की गृहिणी अधिक तयारी करतात ती फराळाची.लाडू,करंजी,अनारसे,चकली,चिवडा,शंकरपाळ्या असे अनेक पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच दिवाळी जवळ आली की सर्वांच्या घरातून खमंग सुगंध दरवळण्यास सुरुवात होते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फराळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य १५ ते २० टक्क्यांनी अधिक महागले आहे.ऐन दिवाळीत वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

