- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने उद्या,शनिवार ९ मे रोजी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून तडजोडपात्र प्रकरणे जलद,सुलभ आणि सामोपचाराने निकाली काढण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे,मोटार अपघात नुकसान भरपाई दावे,कौटुंबिक वाद(घटस्फोट वगळून), भूसंपादनाशी संबंधित प्रकरणे,बँक कर्ज वसुली प्रकरणे,वीज देयके व पाणीपट्टी वाद तसेच धनादेश अनादर प्रकरणे (चेक बाऊन्स-कलम १३८) सामोपचाराने निकाली काढण्यात येणार आहेत. याशिवाय न्यायालयात अद्याप दाखल न झालेली,मात्र वादग्रस्त स्वरूपाची प्रकरणेही लोकअदालतीच्या माध्यमातून सोडविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकअदालतीमध्ये दिला जाणारा निर्णय अंतिम स्वरूपाचा असतो.त्यामुळे संबंधित पक्षांना दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेतून दिलासा मिळतो. सामोपचाराने तोडगा निघाल्यामुळे दोन्ही पक्षांचा विजय होतो,वेळ व खर्चाची बचत होते तसेच परस्परांतील कटुता कमी होऊन सामाजिक सलोखा वाढण्यास मदत मिळते.विशेष म्हणजे, लोकअदालतीमध्ये तडजोड झाल्यास नियमानुसार भरलेली न्यायालयीन फी संबंधितांना परत मिळण्याची तरतूद आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्ह्यातील सर्व नागरिक,पक्षकार तसेच वकील बांधवांना आवाहन केले आहे की,त्यांनी आपल्या प्रलंबित किंवा तडजोडपात्र प्रकरणांमध्ये सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे अधिक्षक,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांनी कळविले आहे.
- Advertisement -

