- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मागील दोन महिन्यांपासून जंगली हत्तींचा कळप गडचिरोली व आरमोरी तालुक्यात घिरट्या घालत आहे.आठ दिवसांपूर्वी हत्तीचा कळप आरमोरी तालुक्यातील किटाळी परिसरात होता. घुमजाव करीत कळप पुन्हा दिभनामार्गे गुरवळा परिसरात दाखल होऊन गुरुवारी गडचिरोली तालुक्याच्या गुरवळा येथील शेखर उईके यांच्या तीन एकरांतील मक्याचे नुकसान केले होते.अशातच आता जंगली हत्तींचा कळप गडचिरोली तालुक्यात ठाण मांडून असून आज,शनिवार २६ एप्रिलला सकाळी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांवर जंगली हत्तींनी हल्ला चढवून तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे.सदरची घटना गडचिरोली तालुक्याच्या कृपाळा गावात सकाळी १० च्या दरम्यान घडली. सुशीला टेमसू मेश्राम,योगीता उमाजी मेश्राम व पुष्पा निराजी वरखडे अशी जखमी महिलांची नावे असून, यातील सुशीला मेश्राम हिला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरला हलविण्यात आले आहे,तर अन्य दोघींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.सकाळच्या सुमारास गावातील काही महिला गावाजवळ असलेल्या नदीतीरावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.अशातच अचानकपणे जंगली हत्तींचा कळप महिलांच्या जवळ आला.यात जवळपास १८ हत्तींचा समावेश असल्याची माहिती आहे.कळप येत असतांनाच काही महिला पळून गेल्या.यातच तीन महिलांवर जंगली हत्तींनी हल्ला चढवला.यातील सुशीला मेश्राम हिला जंगली हत्ती आपटल्याने ती बेशुद्ध पडली.नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळाकडे धाव घेतली.अशातच सुशीला मेश्रामला बेशुद्धावस्थेतच नागपूरला हलविण्यात आले आहे.तर दोन महिलांवर गडचिरोली रुग्णालयात उपचार सुरू आहे.
- Advertisement -

