उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा (गडचिरोली) :-लग्नाच्या बाबतीत दिवसेंदिवस मुलींच्या अपेक्षा वाढतच आहेत.वेल सेटल्ड हवा,या अपेक्षेने तर मुलांना घाम फुटत आहे.हल्ली मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.स्वभाव,कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती,नोकरी,पगार,गाडी, स्वतःचे घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत आहेत.
मुली सरकारी नोकरी करणाऱ्या मुलांना प्राधान्य देत आहेत.सरकारी नोकरी करणारा नवराच बरा, असे या मुलींना वाटतेय.आज ज्या मुलांकडे सरकारी नोकरी आहे; अशा मुलांना मोठी मागणी आहे.पूर्वी ज्याप्रमाणे सेफ नोकरी म्हणून बघितले जायचे,तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे.
मुलगा शेतकरी असला तरी चालेल; पण भरपूर शेती तसेच कुठला तरी व्यवसाय तसेच जोड धंदा असावा, अशी अपेक्षा कमी शिकलेल्या ग्रामीण भागातील मुलींकडून केली जात आहे.यामुळे ज्यांची शेती कमी व तीही कोरडवाहू अशा मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

