- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.केंद्र व राज्य सरकारकडून पुरवठा न मिळाल्यास मे महिन्यानंतर एसटीच्या भाड्यात वाढ करावी लागू शकते,असे त्यांनी स्पष्ट केले.आज,सोमवार १८ मे रोजी मंत्रालयात महामंडळाची बैठक पार पडली.बैठकीत बोलतांना सरनाईक म्हणाले की,एसटी महामंडळाला दररोज सुमारे १० लाख ८७ हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते.इंडियन ऑईल कंपनीकडून डिझेलचा पुरवठा होत असला तरी मागील आठवड्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ झाली आहे.या वाढीमुळे महामंडळाला दररोज तब्बल ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून,वार्षिक तोटा १२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले.जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकेत दिल्याचे सरनाईक म्हणाले.भविष्यात परिस्थिती कशी राहील हे सांगणे कठीण आहे.मात्र,केंद्र किंवा राज्य सरकारकडून विशेष सवलत मिळाल्यास एसटी भाडेवाढ टाळण्याचा प्रयत्न केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.उद्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.मे महिन्यापर्यंत कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही.पुढील १० ते १२ दिवसांत सरकारकडून मदत मिळाल्यास दरवाढ टाळली जाईल,अन्यथा एसटीचे तिकीट दर वाढवावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.तिकीट दर वाढले तर याची झळ पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
- Advertisement -

