- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मतदार यादीतील गोंधळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.मागील आठवड्यात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमितता उघड करत हा मुद्दा जोरात उपस्थित केला होता.त्यानंतर संसदेत तसेच रस्त्यावरही विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे.त्यातच आता पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा मतदारसंघात २०२४ विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत एका ३९ वर्षीय महिलेचे नाव तब्बल सहा वेळा आढळून आले आहे.विशेष म्हणजे,प्रत्येक नोंदीसमोर वेगळा ईपीआयसी (EPIC) क्रमांक म्हणजेच ‘इलेक्टर्स फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड’ (मतदार ओळखपत्र)दिला आहे.यापैकी पाच नोंदी एकाच मतदान केंद्रावर,तर एक नोंद दुसऱ्या मतदान केंद्रावर आहे.सोशल मीडियावर या सर्व नोंदींचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी याप्रकरणी सोशल मीडिया फोटो पोस्ट केला आहे.पालघरमधील मतदार यादीत सुषमा गुप्ता या महिला मतदाराचे नाव तब्बल सहा वेळा आले आहे.विशेष म्हणजे मतदार क्रमांकही वेगळे आहेत. निवडणूक आयोगाचा ४५ दिवसात सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याच्या निर्णयाला असे नाव कारणीभूत असतील का? असा सवालही शेळके यांनी केला आहे.तर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जयश्री शेळके यांची पोस्ट रीट्वीट करत ‘व्होट चोरी एक्सपोझ्ड’ असे म्हटले आहे.संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश देत सविस्तर अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित महिलेने मतदार म्हणून नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करतांना ईपीआयसी कार्ड लवकर मिळावे,या उद्देशाने अनावधानाने सहा वेळा अर्ज भरले असावेत,अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.चौकशीचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणामागील खरी कारणे स्पष्ट होणार आहेत.
- ‘एक्स'(ट्विटर)पोस्ट👇
- Advertisement -

