उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- मयत व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सरकारी योजनेचे पैसे बँक खात्यातून काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने आता संगणकाची सीडॅक सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे रक्ताभिसरण सुरू असलेल्या म्हणजेच जिवंत अंगठ्याचा ठसा उमटला तरच लाभार्थ्याला बैंक खात्यातून पैसे मिळणार आहेत.
राज्यातील विविध शासकीय योजना,शेतकरी कर्जमाफी योजना,विद्यार्थ्यांना विविध विभागांमार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती इत्यादी ५० पेक्षा अधिक योजनांचे पैसे डीबीटी पोर्टलमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.राज्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या खात्यात दरवर्षी ७ हजार कोटी तर शेतकरी आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. याशिवाय निवृत्तीवेतन योजनेची रक्कमसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.त्यासाठी संबंधित लाभार्थ्यास दरवर्षी आपल्या हयातीचा दाखला द्यावा लागतो.तरच रक्कम त्याला
मिळते.परंतु इतर शासकीय योजनांचे तसे नाही. एकदा अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतर त्याला पुन्हा ठसा द्यावा लागत नाही.नेमक्या याच त्रुटीचा फायदा घेऊन अनेकांनी मृत व्यक्तीच्या नावावरून बँकेतून रकमा काढल्या आहेत.याला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन सॉफ्टवेअर आणण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यास थेट रक्कम मिळावी; या हेतूने सरकारने डीबीटी पोर्टल सेवा सुरु केली होती.पण सरकारचा हेतू साध्य होत नसल्याचे काही घटनांमधे मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मृत शेतकऱ्याच्या नावावर पैसे काढल्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्यामुळे याला आळा घालण्यासाठी शासनाने आता सीडॅक सॉफ्टवेअर प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.
(साभार-पुढारी)

