उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- राज्यात पहिल्यांदाच नागपूर आणि चंद्रपूर येथे वन औद्योगिक विकास महामंडळ(एफआयडीसी) सुरू करण्यात येईल,अशी माहिती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.९ मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या संबंधात घोषणा केली जाणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.
राज्यात वन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.टुथ पिक,अगरबत्तीसाठी लागणारी काडी याशिवाय फर्निचरसाठी लागणारे लाकूडही आपण आयात करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला आहे. त्या दिशेने एक पाऊल म्हणून एफआयडीसी सुरू करणार आहोत.आर्थिक आणि औद्योगिक विकासात भर घालणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धर्तीवर हे महामंडळ सुरू करण्यात येणार आहे.
उपजीविकेसाठी कृषी,वन आणि जल विभाग हे महत्वाचे आहे.मासेमारी आणि वनविभागावर उपजीविका चालते.नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे.वनविकास महामंडळ आणि वनविभाग मिळून दरवर्षी ६०० ते ७०० कोटी रुपयांची सागवान लाकडाची विक्री होते.त्याऐवजी तयार फर्निचर विकले जाईल.नागपूर येथे फर्निचरचे तर चंद्रपूर येथे वनौषधींचे सुविधा केंद्र (काॅमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यात येणार आहे.या केंद्रांमध्ये नाममात्र दरात उद्योजकांना सुविधा देण्यात येईल व यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रे खरेदी करण्यात येणार आहे.पर्यावरणावर आधारित औद्योगिक क्षेत्राकडे वळण्याची आज गरज आहे.वनौषधी आणि वनाधारित छोटे उद्योगाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.वनाधारित समूह चंद्रपूर येथे असेल. चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्यात वनौषधीचा खजीना आहे.यासाठी आम्ही वैद्यनाथ,पतंजली,सांडू, डाबर यांच्याशी भागीदारी करणार आहोत.त्याचे प्रशिक्षण आदीवासी शेतकऱ्यांना देण्यात येईल ज्यातून त्यांनाही रोजगार मिळेल असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.