उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपुरात अनेक चौकांमध्ये वाहनचालकांकडून भीक मागण्याचे प्रकार वाढल्याच्या अनेक तक्रारी आहेत.त्यामुळे पोलिसांनी शहरात कलम १४४ अन्वये रस्त्यांवर,चौकात,ट्रॅफिक सिग्नल्सवर थांबून भिकाऱ्यांच्या भीक मागण्यावर तसेच तृतीयपंथीयांद्वारे वाहनचालकांकडून पैसे मागण्यावर बंदी घातली आहे.या आदेशाची आजपासून ९ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी होणार आहे.या बंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास आयपीसी कलम १८८ अन्वये संबंधित व्यक्तीच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल; असा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे.नागपुरात २१ मार्चपासून जी-२० च्या बैठकांचे आयोजन होत असून परदेशी पाहुण्यांपुढे वास्तव दर्शक चित्र जाऊ नये, यासाठी पोलिसांमार्फत हे परिपत्रक काढण्यात आल्याची चर्चा जोरात आहे.
राज्याची उपराजधानी नागपुरात रस्त्यांवर चौकांवर ट्रॅफिक सिग्नल्सवर भिकारी तसेच तृतीयपंथीयांद्वारे वाहन चालकाकडून पैसे मागण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात वाढले होते.विशेषतः पंचशील चौक,शंकर नगर चौक,व्हेरायटी चौक,रेशीमबाग चौक तसेच छत्रपती चौकात तृतीयपंथीयांकडून दमदाटीचे प्रकार मोठ्या संख्येने घडत आहेत.याविषयी तक्रारी देखील झाल्या.पंचशील चौकात उड्डाणपुलाच्या आडोश्याने तसेच यशवंत स्टेडिअमपुढे मुक्काम ठोकणाऱ्या भिकाऱ्यांवर अनेकदा कारवाई झाली.मात्र,काही दिवसानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ दिसत असल्याचा अनुभव नागपूरकरांना नेहमीच येतो.आता पोलिसांनी या प्रकारांवर ३० एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. २१ मार्चपासून शहरात जी-२० च्या उपसमितीची बैठक होत आहे.त्यासाठी २१,२२ आणि २३ मार्च रोजी सुमारे २०० परदेशी पाहुणे नागपुरात आहेत. नागपूरबद्धल चुकीचे चित्र उभे राहू नये; या दृष्टिने हे बंदी आदेश लागू केल्याची चर्चा आहे.दुसरीकडे रस्त्यांवर भिकाऱ्यांकडून तसेच तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांना होणारा त्रास कमी व्हावा; यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची देखील मागणी होत आहे.