उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा प्रकार मागील आठवड्याच्या गुरूवारी भामरागड तालुक्यात दिसून आला.तालुक्यातील एका २२ वर्षीय जेवारी(झुरी) संदीप मडावी या आदिवासी महिलेला प्रसुतीसाठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना नाला ओलांडता न आल्याने जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून नाला ओलांडावा लागला आहे.सदर घटनेमुळे गरोदर महिलेच्या आरोग्यसेवा व सन्मानपूर्वक जीवनाच्या अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत आजाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी थेट राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे.
राज्यभरातून या घटनेचा रोष व्यक्त केला जात आहे. प्रशासन व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कुडकेली या राष्ट्रीय महामार्गावर तात्पुरता बनविलेला पूल पाण्याने वाहून गेला.पावसाळ्यात या भागात उद्भवणाऱ्या परिस्थितीची पूर्वमाहिती असताना देखील तत्परतेने रस्ता व पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही.याचा परिणाम सामान्य नागरिकांना सोसावा लागतोय.भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार,प्रत्येक नागरिकाला मूबलक वैद्यकीय सेवा व योग्य रस्त्यांचा मूलभूत अधिकार आहे.सदर घटनेत महिलेच्या या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि रस्ते बांधकामातील विलंबामुळे अशा गंभीर मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी आवश्यक कारवाई करावी; अशा घटना भविष्यकाळात टाळण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेत आणि सुधारणा कराव्यात,प्रत्येक वर्षी भामरागड सारख्या दुर्गम भागात पावसाळ्यात सहा महिन्यापेक्षा अधिक काळ रस्त्यांच्या तुटणाऱ्या संपर्कामुळे आदिवासी समाजाला अनेक समस्याचा सामना करावा लागतो.
सदर घटनेतून या प्रश्नांची दाहकता परत घटनेतून एकदा पुढे आली आहे.पावसामुळे होणाऱ्या या गंभीर समस्या माहिती असून देखील योग्य पर्यायी मार्ग तयार न करता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले,ही प्रशासनाची मोठी चूक आहे.ज्यामुळे नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे; असे राज बन्सोड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

