- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या शोधात भटकंती करून गावनजिक आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.सदरची घटना देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील इंदिरानगर येथे नुकतीच उघडकीस आली आहे.अनिल मेश्राम वय ३५ वर्षे, रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,कोंढाळा येथील शेतकरी अनिल मेश्राम यांनी गुरुवार,३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरालगत असलेल्या गोठ्यात शेळ्या बांधून ठेवल्या होत्या.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील नागरिक गप्पा मारत असतांनाच गुरुवारच्या रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जंगल परिसरातून आलेल्या बिबट्याने गोठ्यातील एका शेळीला उचलून नेले व जवळच असलेल्या शेतात ठेवून काही भाग फस्त केला.दरम्यान,काही वेळाने परत बिबट्या गोठ्यातील एका शेळीला पकडुन उचलून नेणार तोच शेळीचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून गप्पा मारत बसलेल्या कुटुंबीयांनी गोठ्याकडे धाव घेताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.यात बिबट्याने शेळीच्या मानेला पकडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात होताच नागरिकांनी आरडाओरड करून परिसरात पाहणी केली असता नजीकच्या शेतात एका शेळीला ठार केल्याचे दिसून आले.प्रकरणी घटनेची माहिती मिळताच देसाईगंज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल शुक्रवारच्या सायंकाळी बिबट्याने गावात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच बिबट्याला पिटाळून लावले.सलग दोन दिवस बिबट्याने धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे, इंदिरानगर परिसरातील नागरिक तसेच लहान चिमुकले सायंकाळच्या वेळेस काही कामानिमित्त घराबाहेर पडतात.अश्यातच एखादी अनुचित घटना घडू नये, यासाठी वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.त्याचबरोबर, बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी परिसरात गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- Advertisement -

