- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात एक धक्कादायक तितकीच अचंभित करणारी घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,एका सुशिक्षित तरुणास सुशिक्षित तरुणाने साथीदारांसह मिळून जाळ्यात ओढले आणि चक्क उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली.फसवणूक तर झाली,पण साधी-सुधी नाही तर कोट्यवधी रुपयांना चुना लावला गेला.क्यूआर कोड,फोनपे क्रमांक व बँक खात्यांद्वारे सुमारे २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपयांची वसुली करण्यात आली.प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस)कलम ३(५) व ३१८(४)अंतर्गत गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीस पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे.तर अन्य चार आरोपींचा शोध सुरू आहे.ज्ञानेश्वर शिवाजी वारे वय ३० वर्षे रा.वरोडी खुर्द,ता.भोर,जि.पुणे असे मुख्य आरोपीचे नाव असून आज,बुधवार २२ एप्रिल रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अजय गोवर्धन भगत,मुकेश यादव, संदीप कुमार व महाजन साहेब अशी फरार आरोपींची नावे आहेत.तर सागर गणपत मडावी वय २७ वर्षे रा.दुर्गानगर,गडचिरोली असे प्रकरणातील पिडीत तरुणाचे नाव असून २०१३ मध्ये एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा जंगलात झालेल्या चकमकीत शहीद झालेले अंमलदार गणपत नेहरु मडावी यांचा मुलगा आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक ही २० जानेवारी २०२४ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
सदर प्रकरण असे की,२०१३ मध्ये एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा जंगलात झालेल्या चकमकीत अंमलदार गणपत नेहरु मडावी हे शहीद झाले होते. राज्य सरकारच्या धोरणानुसार शहीद जवानांच्या कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी दिली जाते.त्या अनुषंगाने गणपत मडावी यांचा मुलगा सागर मडावी याने अनुकंपा तत्वावर वर्ग-१ पदासाठी राज्य शासनाकडे अर्ज केला होता.अश्यातच २०२२ मध्ये सागर हा पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना त्याची ओळख ज्ञानेश्वर वारे याच्याशी झाली.त्याला सागर हा अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कळले. त्यानंतर ज्ञानेश्वर वारे याने आपली मंत्रालयात ओळख असून,तुला उपजिल्हाधिकारी वर्ग-१ पदासाठी मदत करेन.मात्र,त्यासाठी पैसे द्यावे लागतील,असे सागरला सांगितले.पुढे ज्ञानेश्वर वारे याने सागर व त्याची आई मीना मडावी यांच्याकडून अन्य चार आरोपींच्या मदतीने वेळोवेळी रोख स्वरुपात,फोन पे वरुन आणि एटीएममधून २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपये उकळले.एवढी मोठी रक्कम देऊनही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सागर मडावी याने २० एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली.त्यावरुन पोलिसांनी
ज्ञानेश्वर वारे याच्यासह अन्य चार आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.त्यानंतर गडचिरोलीचे पोलिस पथक पुणे जिल्ह्याकडे रवाना झाले.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड, गडचिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मुसनवार यांच्या नेतृत्वातील पथकाने ज्ञानेश्वर वारे यास पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अप्पर पोलिस अधीक्षक एम.रमेश,कार्तिक मधिरा,गोकुल राज जी,सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
- Advertisement -

