- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी-गडचिरोली महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तातडीने अपघात स्थळी भेट दिली व मृत्यूमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.तत्पूर्वी त्यांनी एमआयडीसी हेलिपॅड येथे जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.दोन जखमींना नागपूर येथे हेलिकॉप्टरने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.या भेटीदरम्यान अनेक ग्रामस्थ भावनिक अवस्थेत होते.अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांशी मंत्री भुसे आणि जिल्हाधिकारी पंडा यांनी थेट संवाद साधला.त्यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. “दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात शासन तुमच्या सोबत असून योग्य ती मदत आणि कारवाई केली जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
शासनाकडून मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असेही यावेळी सांगण्यात आले. गावकऱ्यांनीही या वेळी आपल्या व्यथा मांडल्या आणि महामार्गावरील वाहतुकीच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली.अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांना मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे सभागृहात दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘एक्स'(ट्विटर) अकाऊंटवरून मृत युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले.गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.त्यांनी या अपघातात आणखी २ युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांच्या उपचारासाठी तातडीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले असून त्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून,जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे,असेही त्यांनी जाहीर केले.
- Advertisement -

