- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पुढील येत्या काळात होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी माहिती पुढे आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज,सोमवार ४ ऑगस्ट रोजी मोठा निर्णय देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.यात महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत.प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ११ मार्च २०२२ च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी,अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज,सोमवार ४ ऑगस्ट रोजी फेटाळून लावली आहे.सदरची निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे होणार आहे.आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड,प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील,हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की,६ मे २०२५ च्या आदेशानुसार २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील. वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे.राज्य विधिमंडळाने तसा कायदा केला आहे आणि या कायद्याला स्थगिती नसल्याने हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचा आहे,असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.याआधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्देश जारी करण्याचे आदेश दिले होते.आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीसारख्या २७ टक्के ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणूका घेण्यास काही हरकत नसल्याचे स्पष्ट केल्याने अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
- Advertisement -

