- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, बुधवार २२ जुलै रोजी ५६ वा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.त्यानुसार,देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद गडचिरोली व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप करण्यात आले.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते दृष्टीदोष असलेल्या ३४ विद्यार्थ्यांना ही उपकरणे प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’ स्पर्धेत विजेते ठरलेल्या डीप व्हिजन टेक या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेले हे ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरण दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.जिल्हा परिषद गडचिरोलीला या उपक्रमांतर्गत एकूण ५० उपकरणे प्राप्त झाली असून,त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३४ विद्यार्थ्यांना उपकरणांचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना उपकरणाच्या वापराबाबत, त्यातील विविध सुविधा तसेच प्रत्यक्ष हाताळणीविषयी तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना या उपकरणाचा प्रभावी वापर करून दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वासाने वावरता येणार आहे.
‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणाच्या माध्यमातून समोरील वस्तू,अडथळे आणि परिसराची माहिती ध्वनीच्या स्वरूपात मिळते.तसेच पुस्तके,वर्तमानपत्रे व इतर मुद्रित मजकूर वाचून दाखविणे,चलनी नोटा ओळखणे,परिचित व्यक्तींची ओळख पटविणे तसेच जीपीएसच्या सहाय्याने मार्गदर्शन करणे अशा अत्याधुनिक सुविधा या उपकरणात उपलब्ध आहेत.त्यामुळे शिक्षण,प्रवास आणि दैनंदिन व्यवहार अधिक सुरक्षित,सुलभ व स्वावलंबीपणे करणे शक्य होणार आहे.
या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही उपकरणे ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’ स्पर्धेतील विजेत्या स्टार्टअपकडून उपलब्ध झाल्याने त्यासाठी जिल्हा परिषद गडचिरोलीवर कोणताही आर्थिक भार पडलेला नाही.उपकरणांच्या खरेदीचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीमार्फत करण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण,स्वावलंबन आणि सामाजिक सहभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून,या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा दीव्यांग सक्षमीकरण अधिकारी चेतन हिवंज यांनी दिली.
- Advertisement -

