- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वन्य प्राण्यांचे जंगल मानवी वस्त्यांत रूपांतरित होऊ लागल्याने वन प्राण्यांच्या भटकंतीत वाढ झालेली दिसून येत आहे.विशेष म्हणजे,ज्यांच्या घरावर आपण कब्जा करणार,असा मनुष्य वा प्राणी आपले हक्क मुळीच सोडणार नाही.त्यामुळे वाघ, अस्वल, बिबट्या व इतर हिंस्त्र प्राण्यांचा मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळलेला दिसून येतो.अश्यातच गावापासून हाकेच्या अंतरावर शेतात असलेल्या घराच्या छपरीत (ओसरीत) दाराच्या आड झोपून असलेल्या बिबट्याला खुर्चीचा धक्का लागला आणि त्याने चक्क शेतकऱ्यावर हल्ला चढविला.यात शेतकऱ्याच्या छाती व पाठीवर गंभीर दुखापत झाली.आतील दार बंद असल्याने घरातील मंडळी सुदैवाने बचावली असल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील खंडाळा (पिपरी) शिवारात काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली. कैलास परसराम गभणे वय ३९ वर्षे,रा.खंडाळा-पिपरी,ता.मौदा, जि.नागपूर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कैलास गभणे यांची शेती गावापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आहे.मागील काही वर्षापासून कुटुंबीयांसह शेतातील घरात राहतात.धानाच्या रोवणीसाठी चिखलणी करायची असल्याने ते काल रविवारी सकाळी सहाच्या सुमारास झोपेतून जागे झाले आणि आंघोळीसाठी पाणी गरम करायचे असल्याने ते घराचे मुख्य दार उघडत छपरीत गेले. दाराशेजारी खुर्ची होती व खुर्चीच्या बाजूला ओसरीत बिबट्या झोपून होता.कैलास यांचा अनवधानाने खुर्चीला धक्का लागला.खुर्चीचा धक्का लागताच बिबट्या चवताळून उठला व त्याने कैलासवर हल्ला चढविला.दोनदा झडप मारल्याने ते खाली कोसळले व आरडाओरडा करू लागले.त्यामुळे बिबट्या पळून गेला.मात्र,हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. श्रीधर गभणे यांनी त्यांना मौदा तालुक्याच्या धानला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.तिथे प्रथमोपचार केल्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.माहिती मिळताच मौदाचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या सूचनेवरून ग्राम महसूल अधिकारी तुषार इडपाते,माजी पंचायत समिती सभापती स्वप्निल श्रावणकर,ठाणेदार स्नेहल राऊत,सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील सोनवणे,वन विभागाचे श्रावण अडमाची यांनी घटनास्थळाची पाहणी केली.घटनेच्या वेळी कैलासची पत्नी व इतर सदस्य घरात झोपले होते.कैलास यांनी घराबाहेर पडताच दार बंद केले होते.त्यामुळे बिबट्याला आत शिरणे शक्य झाले नाही.त्यामुळे घरातील मंडळी सुरक्षित राहिली.
- Advertisement -

