उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांची नेहमीच या.. ना.. त्या..कारणासाठी पिळवणूक केली जाते आहे.नेहमीच चिंताग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.अशातच धान्य खरेदी केंद्रांवर शेतकरी बांधवांची लूट थांबवावी व अतिरिक्त धान खरेदी होत असल्याबाबत चौकशी करावी; अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
आदिवासी महामंडळामार्फत चालू असलेल्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोली अंतर्गत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक केली जात आहे.याबाबत जर कुणी शासनाच्या परिपत्रकाची गोष्ट केली तर केंद्र बंद करण्याची केंद्रप्रमुख शेतकऱ्यांना धमकी देत आहेत.शासनाच्या परिपत्रकानुसार प्रति बारदाना ४० किलो ६०० ग्राम खरेदी करावे असे सांगितले आहे.तसेच धानाची खरेदी करताना प्रति बारदाना हमाली सुद्धा शासन देणार हे सांगितले आहे.परंतु आदिवासी महामंडळच्या अभिकर्त्यांमार्फत शेतकऱ्यांकडून प्रति बोरा ४१.६०० किलोने खरेदी सुरू आहे.तसेच प्रति बारदाना ६ ते ८ रुपये इतकी हमाली सुद्धा शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जात आहे.शेतकरी मोठ्या मेहनतीन धान विक्रीसाठी नोंदणी करतात.परंतु अभिकर्त्यांमार्फत अगोदर व्यापाऱ्याचा धान खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाची घरी जागा नसल्याने बाहेर उंदीर,घूस यांच्याकडून नासधूस होत आहे. शेतकरी आक्रमक नसल्याने यांच्या विरोधात जाण्यास घाबरतो.तक्रार केली तर आपला धान खरेदी केला जाणार नाही,अशी भीती शेतक-यांना असते.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खरेदी केंद्रांवर आपल्या यंत्रणेमार्फत नियंत्रण ठेवून शेतकरी बांधवाना न्याय द्यावा; अशी मागणी खुणे यांनी निवेदनातून केली आहे.

