- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवसेंदिवस बदलत असलेले हवामान शेतीसाठी जोखीमीचे ठरत आहे.अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,दुष्काळ,गारपीट,पूर तसेच कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे आणि शेती उत्पादनातील सातत्य अबाधित राहावे,या उद्देशाने राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ व रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे.या सुधारित योजनेत पारदर्शकता,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
या योजनेचा मोठा फायदा म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे पीकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे.त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर,सुधारित शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि कृषी क्षेत्रातील पतपुरवठाही अधिक सक्षम राहण्यास मदत होईल.
- योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणारे प्रमुख लाभ👇
- नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीस आर्थिक संरक्षण.
- कमी हप्त्यात अधिक विमा संरक्षण.
- नुकसान भरपाई प्रक्रियेत पारदर्शकता.
- लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही लाभ.
- आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक नुकसान मूल्यांकन.
- कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही सहभागाची संधी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये पीक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्यक्ष पेरणीची अचूक माहिती उपलब्ध होऊन चुकीच्या दाव्यांना आळा बसेल आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह होईल.शेतकऱ्यांना किमान ०.१० हेक्टर क्षेत्रासाठीही विमा अर्ज करता येणार असल्याने लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सुधारित योजनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फसवणुकीविरोधातील कठोर तरतुदी.बनावट कागदपत्रे, चुकीची पीक माहिती किंवा फसव्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला केवळ पीक विमाच नव्हे,तर नमो शेतकरी महासन्मान योजनेसह कृषी विभागाच्या विविध डीबीटी योजनांपासून पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण होण्यास मदत होईल.
विमा हप्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत परवडणारा ठेवण्यात आला आहे.खरीप हंगामातील अन्नधान्य व गळीतधान्य पिकांसाठी केवळ २ टक्के,रब्बी हंगामासाठी दीड टक्के,तर नगदी पिकांसाठी ५ टक्के इतकाच शेतकरी हिस्सा राहणार आहे.उर्वरित प्रीमियम राज्य व केंद्र शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात भरला जाणार असल्याने कमी खर्चात मोठे विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे.
या योजनेत ७० टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे.तसेच मागील सात वर्षांपैकी सर्वोत्तम पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या आधारे उंबरठा उत्पादन निश्चित करण्यात येणार असल्याने नुकसान भरपाईचे गणित अधिक वास्तववादी व शेतकरी हिताचे ठरणार आहे.
योजनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर.पीक कापणी प्रयोगांबरोबरच उपग्रह प्रतिमा,रिमोट सेन्सिंग,ड्रोन आणि स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाचा अंदाज घेतला जाणार आहे.तसेच पीक नुकसानीचे मूल्यांकन अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक पीक कापणी प्रयोगाची नोंद प्रत्यक्ष शेतात जाऊन केंद्र शासनाच्या CCE Agri App या मोबाईल ॲपवर छायाचित्रांसह, जीपीएस स्थान व वेळेच्या नोंदीसह करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह,पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहे.
योजनेचा लाभ केवळ कर्जदार शेतकऱ्यांनाच नव्हे तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही ऐच्छिक स्वरूपात मिळणार आहे.तसेच कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही नोंदणीकृत भाडेकराराच्या आधारे या योजनेत सहभागी होऊ शकतात.त्यामुळे अधिकाधिक शेतकरी विमा संरक्षणाच्या कक्षेत येतील.
खरीप हंगामात भात,ज्वारी,बाजरी,नाचणी,मका,मूग, उडीद,तूर,सोयाबीन,भुईमूग,तीळ,करडई,कापूस आणि कांदा यांसारख्या प्रमुख पिकांचा समावेश आहे.रब्बी हंगामात गहू,हरभरा,रब्बी ज्वारी,मका,उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि कांदा यांसारख्या पिकांनाही विमा संरक्षण उपलब्ध राहणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अधिसूचित तालुके,महसूल मंडळे व पिकांचा सविस्तर समावेश यात करण्यात आला आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागू असलेल्या पीक विम्याच्या तरतुदींची स्पष्ट माहिती उपलब्ध होणार आहे.त्यामुळे राज्यातील बहुतांश प्रमुख पिकांना संरक्षण मिळेल.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहे.खरीप हंगामासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.अर्ज करतांना ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी,डिजिटल पीक नोंदणी,आधार क्रमांक,बँक खाते,सातबारा/८-अ उतारा(लागू असल्यास)तसेच आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा.
एकंदरीत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केवळ नुकसानभरपाईची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक प्रक्रिया आणि शेतीतील सातत्य देणारी व्यापक संरक्षण योजना आहे.बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा हा आता पर्याय नसून शेतीसाठी आवश्यक आर्थिक सुरक्षा कवच बनला आहे.त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने वेळेत नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा.योग्य वेळी घेतलेले विमा संरक्षण संकटाच्या काळात आर्थिक आधार देऊन शेती अधिक सुरक्षित,शाश्वत आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्यास निश्चितच मोलाची भूमिका बजावेल.
- Advertisement -

