- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ऐन नवरात्री उत्सवातच परतीच्या पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा,सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तर धुळे,नंदुरबार आणि जळगाव येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.विदर्भातही पावसाची तीव्रता वाढणार असून बुलढाणा,चंद्रपूर, गडचिरोली,वर्धा,वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून शहरी भागात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आज,मंगळवार २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील तब्बल ३१ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.याशिवाय ५ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून,पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.राज्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीड,छत्रपती संभाजीनगर,अहमदनगर,नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून,विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.दरम्यान,राज्यातील उर्वरित ३१ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याचा अंदाज असून,काही भागांत जोरदार सरींचाही अनुभव येऊ शकतो.पावसाच्या या मालिकेमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.विशेष म्हणजे,उद्या,बुधवार २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे.या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे,जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे.यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.२७ तारखेला विदर्भ,मराठवाडा,खानदेश,कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते,आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Advertisement -

