- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच काळाबाजार,साठेबाजी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून,आता आधार लिंक केल्याशिवाय खतांची विक्री करता येणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामागील प्रमुख उद्देश म्हणजे खतांचा योग्य वापर सुनिश्चित करणे,अपव्यय टाळणे आणि शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात व योग्य दरात खत उपलब्ध करून देणे हा आहे.यासाठी सर्व खत विक्रेत्यांना पॉईंट ऑफ सेल(e-POS)मशीनचा वापर करूनच खत विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.संबंधित मशीनद्वारे शेतकऱ्यांची ओळख पटवूनच व्यवहार नोंदविणे आवश्यक राहणार आहे.
काही ठिकाणी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांचा अंगठा घेऊन जास्त गोण्यांची नोंद करून प्रत्यक्षात कमी खत देण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.विशेषतः युरिया खताच्या बाबतीत अशा प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याने या निर्णयाद्वारे अशा गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी विभागाने खत विक्रेत्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.त्यानुसार,कोणत्याही परिस्थितीत आधार लिंक करूनच खत विक्री करावी लागेल.तसेच e-POS मशीनवरील ग्राहकाचे नाव, विक्री केलेल्या गोण्यांची संख्या आणि दिलेले बिल यामध्ये तंतोतंत सुसंगती असणे आवश्यक आहे. विक्रेत्यांच्या गोदामातील साठा आणि e-POS प्रणालीवरील साठा यामध्येही अचूक मेळ असणे बंधनकारक करण्यात आले आहे.याशिवाय खतांची विक्री केवळ शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीतच करावी,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान,ज्या विक्रेत्यांनी नवीन e-POS प्रणालीमध्ये नोंदणी केली नाही किंवा नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर कृषी विभागाकडून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी कळविले आहे.
- Advertisement -

