- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज,शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली.
रेशीमबाग मैदानावर आज मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन,अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनींना अभिवादन करुन मुख्यमंत्री म्हणाले,या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख भगिनींच्या खात्यात लाभाची ३ हजार रुपये जमा करण्यात आली आहे. आज दुसऱ्या टप्यात ५२ लाख भगिनींच्या खात्यात १५६२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.अशा पद्धतीने १ कोटी ६० लाख महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.राज्याच्या तिजोरीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळायलाच हवा.या योजनेच्या उत्तम अंमलबजावणीमुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.या संबंधात कोणत्याही अपप्रचाराला महिलांनी बळी पडू नये.ही योजना भविष्यातही कायम स्वरुपी सुरु राहणार असून लाभाच्या रकमेत वाढ होणार आहे.सर्वसामान्य महिलांसाठी दीड हजार ही रक्कम मोठी आहे.या रकमेतून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मोठी मदत होणार असून अर्थव्यवस्थेलाही या योजनेमुळे चालना मिळणार आहे,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या लखपती दिदी योजनेत राज्यातील ५० लाखांहून अधिक महिलांना लखपती केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.सरकार अत्यंत संवेदनशीलतेने निर्णय घेत आहे.तरुणांनाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे.राज्य शासन अत्यंत संवेदनशिलतेने कार्य करीत आहे.शिक्षण शुल्क भरु न शकल्याने आत्महत्या कराव्या लागलेल्या तरुणीची माहिती मिळताच राज्य शासनाने शिक्षण शुल्कात पूर्ण सवलत देण्याच्या निर्णय घेतला.राज्यातील सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी देणारे आणि कृतीशीलतेने काम करणारे सरकार आहे. या सरकारने विविध घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी करतांनाच विकास आणि जनकल्याण याची सुयोग्य सांगड घातली आहे.या साऱ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासमवेत त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले आहे.याबाबतच्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे रेशीमबाग येथील आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय आयुक्त,पोलीस आयुक्त,मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अदिती तटकरे यांनी केले.तत्पूर्वी ढोलताशांच्या गजरात व औक्षण करुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत झाले.येथे उभारण्यात आलेल्या विशेष मंचावर प्रवेश करताच महिलांनी हात उंचावून आणि राखी बांधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञभाव व्यक्त केला.त्यांनी उपस्थित महिलांवर पुष्पवृष्टी करुन महिलांचे अभिनंदनही केले.मध्यप्रदेशच्या खासदार माया नरोलिया,आमदार चंद्रशेखर बावनकुळे,टेकचंद सावरकर,कृष्णा खोपडे,मोहन मते,विकास कुंभारे, प्रवीण दटके,ॲड.आशिष जयस्वाल,समीर मेघे,माजी मंत्री ॲड.सुलेखा कुंभारे,महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूपकुमार यादव, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -

