उद्रेक न्युज वृत्त :- छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूर आणि कांकेर सीमेवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांने १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.यापैकी ३ महिलांसह एकूण १० नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एके-४७ शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत.या चकमकीमध्ये अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
नारायणपूर-कांकेर सीमा भागातील अबुझमद येथे मंगळवारी सकाळपासून डीआरजी आणि एसटीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांची शोध मोहीमही सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवरील तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री उशिरा शोध मोहीम राबवली.
आज,मंगळवारी सकाळी जवान त्या भागात पोहोचले असता त्यांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला.या चकमकीमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे.या महिन्याच्या सुरुवातीला कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आतापर्यंत नारायणपूर आणि कांकेरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ८८ नक्षलवादी ठार झाले आहेत.

