उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- ज्यांचे आधार बनू लागले; अशांनाच शासन निराधार करू लागले आहेत.तुटपुंज्या मानधनावर जास्तीचे काम करवून घेणे; ही शासनाची प्रणाली झाली आहे.ग्रामीण घरकुल योजना शासनाची अत्यंत महत्त्वाची व लक्षवेधी योजना आहे.या योजनेत राज्य, विभाग,जिल्हास्तरावर प्रोग्रामर व तालुकास्तरीय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत.परिणामी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे घरकुल योजना-ग्रामीणच्या प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी मूळ मानधनामध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे संपूर्ण काम राज्यस्तर,विभाग स्तर, जिल्हास्तरावर प्रोग्रामर व तालुकास्तरावर ऑपरेटर मागील अनेक दिवसांपासून करीत आहेत. मात्र, त्यांना त्या तुलनेत मानधन मिळत नाही,सोयीसुविधा मिळत नाही.परिणामी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रोगामर व ऑपरेटर यांनी मानधनवाढ व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले असून, यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांना निवेदन दिले आहे.मात्र, या प्रकल्प संपामुळे घरकुल योजनेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर दिलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या👇
वयाच्या ५८ वर्षापर्यंत नोकरीची हमी द्यावी, ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन च इतर सर्व विभागांमध्ये ज्याप्रमाणे एचआर पॉलिसी लागू आहे तशीच सर्व ग्रामीण गृहनिर्माण यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात, मूळ मानधनात एकूण ३० टक्के मानधनवाढ करावी,महिन्याच्या पाच तारखेच्या आत मानधन मिळावे, सीएससी ई-गव्हर्नन्स संस्थेमार्फत प्राप्त होणाऱ्या मासिक मानधनाचा तपशील पाहता एकूण मूळ मानधनातून ग्रॅच्युईटी,ईएसआयसी,पीटी यांची मासिक रक्कम कपात केली जाते.यांच्या मासिक मूळ माधनातून पीएफ, ग्रॅच्युईटी, ईएसआयसीची कपात न करता ती नियमानुसार संबंधित संस्थेने अदा करावी,शासकीय भरतीमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांच्या समावेश आहे.
निवेदन सादर करतेवेळी जिल्हा प्रोग्रामर नकुल तम्मेवार,जिल्हा ऑपरेटर विलास मेश्राम,सुभाष दोनाडकर,किशोर मारगावे,पुरण कऱ्हाडे,सुहास कटरे, ज्योती मोहूर्ले,प्रकाश नागपुरे,रमेश मडावी,लवकुमार दुर्गे,अनंता गुरुनूले,दिलीप कण्णाके,तिरुपती आदी उपस्थित होते.

