- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जंगलात भटकंती आणि हिंसेच्या मार्गातून काहीही साध्य होत नाही,हे स्वतःच्या २२ वर्षातील अनुभवातून स्पष्ट झाल्याने “हिंसेचा मार्ग सोडा आणि संविधानाचा स्वीकार करून मुख्य प्रवाहात या,” असे भावनिक आवाहन आत्मसमर्पित नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या माजी सहकाऱ्यांना केले आहे.
संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या पती गिरिधर तुमरेती व इतर साथीदारांसह २२ जून २०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते.सुमारे दोन दशकांहून अधिक काळ(२००२ पासून)नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या संगीता यांनी या काळात जंगलातील कठीण जीवन अनुभवले; मात्र हा मार्ग चुकीचा असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंसेचा त्याग करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.त्यांनी सांगितले की, “नक्षल चळवळीत राहून कोणताही सकारात्मक बदल घडत नाही.उलट स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य अंधारात जाते.त्यामुळे मी संविधानिक मार्ग स्वीकारला.”
आपल्या उर्वरित सहकाऱ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, “उगीच जंगलामध्ये भटकू नका.तुमचे आई-वडील, कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत.त्यांच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी आत्मसमर्पण करा व सामान्य जीवन जगा.”
- शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घ्या- आमदार धर्मरावबाबा आत्राम👇
अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील उर्वरित नक्षलवादी यांनी आत्मसमर्पण करून शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.राज्य शासनाकडून आत्मसमर्पण करणाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी विविध पुनर्वसन योजना राबविल्या जात आहेत.यामध्ये आधार कार्ड,पॅन कार्ड,बँक पासबुक आदी ओळख पत्र व सेवांच्या नोंदणीसह आर्थिक मदत,निवास व्यवस्था,शिक्षण तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.या योजनांचा लाभ घेऊन सन्मानाने नवे आयुष्य सुरू करता येते,असे आमदार आत्राम यांनी म्हटले आहे.
- Advertisement -

