- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा-लवारी मार्गावरील नाल्याच्या पुलावर १ मे २०१९ रोजी झालेल्या भूसुरुंग स्फोटातील कटकारस्थानात प्रमुख सूत्रधार असलेल्या कुरखेडाच्या कैलाश रामचंदानीला सर्वोच्च न्यायालयाने काल मंगळवारी विविध अटींवर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान आणि १ चालक शहीद झाले होते.या हल्ल्यात नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आणि पोलिसांच्या हालचालींची माहिती नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
नक्षलवाद्यांनी ३० एप्रिलच्या रात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर-रामगड येथील रस्त्याच्या कामावरील तब्बल २७ वाहने आणि अन्य यंत्रसामग्री जाळली होती.त्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘महाराष्ट्र दिनी’ म्हणजेच १ मे २०१९ रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता.भूसुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली होती व संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.त्यात कुरखेडा येथील व्यापारी कैलाश रामचंदानी याला २९ जून २०१९ रोजी अटक करण्यात आली होती.सुरुवातीला प्रकरणाचा तपास पोलिसांकडे होता.मात्र,केंद्राच्या नव्या धोरणानुसार नक्षल संबंधित घटनांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे(NIA)देण्यात आला.त्यानुसार, गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा स्फोटाच्या तपासाचे पहिले प्रकरण ‘एनआयए’ कडे देण्यात आले.याच काळात एनआयएने आरोपी कैलाश रामचंदानीचे हात पोलिस कर्मचाऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत,असा दावा न्यायालयात केला होता.तेव्हापासून तो आजतागायत तुरुंगातच होता.तत्पूर्वी रामचंदानीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.मात्र, न्यायलयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता.जामीन न देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध कैलाश रामचंदानीने ५ मार्च २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्याने सांगितले की,तो २०१९ पासून तुरुंगात आहे आणि अद्याप त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले गेलेले नाही. सहआरोपींना मात्र जामीन मिळाला आहे,असा युक्तिवाद त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. त्यानुसार,काल मंगळवारी सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने विविध अटींवर अंतरिम जामीन मंजूर केला.जामीन मंजूर होताच कैलाश रामचंदानी हा दर आठवड्याला स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी लावेल.तसेच पोलिसांना आपला मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.कुठे जायचे असल्यास विशेष एनआयए न्यायालयाची पूर्वसंमती घ्यावी लागेल.मूळ ठिकाणाशिवाय दुसरीकडे राहता येणार नाही. परिसरातील नक्षलवाद्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा जामीन अटींचे उल्लंघन केले,तर विशेष तपास यंत्रणा(एनआयए)अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी करू शकते,इत्यादी अटींवर रामचंदानीला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- Advertisement -

