- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-अवैध रेतीचा खेळ खुलेआम सुरू असतांना तीन साजातील तलाठ्यांनी जणूकाही डोळ्यावर पट्टी बांधल्याचे एसडीएम म्हणजेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिन्ही तलाठ्यांची वेतनवाढ थांबविण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील महसूल विभागाची यंत्रणाच रेती माफियांच्या दावणीला बांधली गेल्याची चर्चा आहे.अश्यातच माफियांनी रेती चोरीची पद्धत बदलली असून बैलगाडीच्या माध्यमातून बोपाबोडी आणि इतर ठिकाणावरून सुमारे ५० ते ७५ बैलगाड्याच्या साहाय्याने रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांना मिळाली.माहितीच्या आधारे महसूल पथकाने धाड टाकली असता रेती भरून जाणाऱ्या बैलगाड्या आढळून आल्या.त्यानुसार बैलगाड्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या.अवैध रेतीचे प्रकार घडू नये,याकरिता तालुकास्तरीय भरारी पथक तयार करून तस्करांवर आळा घालून महसूल गोळा करावा,असे आदेश उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी
सडक अर्जुनीच्या तहसीलदारांना दिले.सोबतच ज्या तलाठ्यांच्या साजांतून अवैध रेतीची चोरी होत आहे. अश्या तलाठ्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेशही दिले आहेत.शासन स्तरावरून गौण खनिजाच्या स्वामित्वधनावरील महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने दरवर्षी त्या-त्या तहसील कार्यालयास उद्दिष्ट देण्यात येते.त्यानुसार २०२५-२६ या वर्षाकरिता गौणखनिज उत्खनन नियमापासून मिळणाऱ्या रकमेंतर्गत सडक अर्जुनी तहसील कार्यालयाला ३२३.५२ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.सदरचे उद्दिष्ट ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश आहेत.त्यामुळे रेती घाटांतून होणाऱ्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालणे गरजेचे आहे.मात्र, अवैधपणे रेती उत्खनन झाल्यास उद्दिष्ट साध्य होणार कसे?
- Advertisement -

