- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- ‘मुले देवाघरची फुले’ असे मानून आई- वडील आपल्या मुलांची जोपासना करतात.मात्र,नव्या पिढीची मुले ‘ऐकावे जनाची अन् करावे मनाची’ अश्या मनःस्थितीची झाल्याने आई-वडिलांची चिंता वाढलेली दिसून येते.असाच काहीसा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.एका दहा वर्षीय मुलाने त्याचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून रुसला आणि घर सोडून पळाला.त्यामुळे आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकून एकच धांदल उडाली होती.पोलिसांनी तत्परतेने त्याचा युद्धपातळीवर शोध घेतला.इतकेच नाही तर केक कापून त्याचा वाढदिवसदेखील साजरा केला.वाठोडा पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.संबंधित १० वर्षांचा मुलगा हा वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो.त्याचा काल गुरुवारी वाढदिवस होता. मात्र,सकाळी पालकांना वाढदिवस साजरा का केला नाही,असा सवाल त्याने केला व त्यावरून तो संतापला.त्या रागातच तो सकाळी ११ वाजता घराबाहेर पडला.त्याच्या घरच्यांनी खूप शोध घेतला.मात्र,तो कुठेच न आढळल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.त्यांनी वाठोडा पोलिस ठाण्यात याची माहिती दिली.पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वेगवेगळी पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली.पोलिसांनी त्याचे फोटोदेखील शेअर केले. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर परिसराजवळ बीट मार्शल शशिकांत बक्कल, शैलेंद्रसिंग यांना १० वर्षीय मुलगा आढळला. पोलिस त्याला वाठोडा पोलिस ठाण्यात घेऊन गेले.तेथे त्याच्या आई-वडिलांनादेखील बोलविण्यात आले.मुलाला पाहून पालकांचा बांधच फुटला.पोलिसांनी लगेच केकचीदेखील व्यवस्था केली व त्याच्या घरी पोहोचले.त्याच्या घरासमोरच केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करून त्याची समजूत काढली.
- Advertisement -

