नागपूर :-सर्वत्र फेसबुक,इंस्टाग्राम व विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री तथा प्रेम-प्रकरणे घडत असल्याचे आपण नेहमीच पाहत असतो व तश्या घटनाही उघडकीस येऊ लागल्या आहेत.अशातच मुलींकरिता सोळावे वरीस धोक्याचे,असे म्हटले जाते.तिचेसुद्धा वय वर्षे १६,मुक्काम पोस्ट सुरत,गुजरात.नववीत शिकणाऱ्या सारिका (नाव काल्पनिक)चंद्रपूर जिल्ह्यातील फेसबूक फ्रेंडवर प्रेम जडले.त्याच्यासाठी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता हाती लागेल तेवढे दागिने बॅगमध्ये कोंबून ती सुरतहून थेट नागपुरात पोहचली.ठरल्याप्रमाणे तो मात्र येथे दिसलाच नाही.त्यामुळे ती कावरीबावरी झाली. अशातच तिला दोन समजदार ऑटोवाले भेटले अन् तिचे काळोखात जाऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित झाले.
१६ वर्षीय मुलीचे फेसबूक फ्रेंडवर प्रेम जडले अन् दागिने घेऊन निघाली प्रियकराच्या शोधात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
सारिका चांगल्या सधन घरातील मुलगी आहे.घरी साऱ्या सुख-सुविधा,अर्थातच महागडा मोबाइलही सोबतीला अन् कोणतीही रोकटोक नसल्याने मुलगी ऑनलाइन जगताची सैराट सफर करू लागली.अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाशी तिची फेसबूकवरून ओळख झाली.ती त्याच्या प्रेमात गुरफटली.वयाच्या पुढे जाऊन स्वप्न बघू लागली अन् संधी मिळताच शुक्रवारी तिने बॅग भरली.हाती लागले तेवढे सोन्याचे दागिने त्यात टाकले अन् थेट अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये बसली.शनिवारी सायंकाळी नागपूर स्थानकावर उतरल्यानंतर तिची नजर भिरभिरू लागली.फलाटावरील हजारोंच्या गर्दीत तिला तिचा ‘तो’ मित्र शोधायचा होता,कारण आधी बोलणी झाल्याप्रमाणे तो तिला रेल्वे स्थानकावर भेटणार होता. गर्दी ओसरली.गाडीही निघून गेली.तो मात्र कुठेच दिसत नव्हता.शेवटी ती फलाट क्रमांक ६ जवळच्या एफओबी जवळ येऊन उभी राहिली. कदाचित तिच्या जवळचे पैसे संपले असावे.ती ऑटोजवळ आली. मोहम्मद शहजाद अब्दुल कलाम वय २० वर्षे आणि बादल सूर्यभान बावणे वय ३२ वर्षे यांच्यासोबत तिची बातचीत सुरू झाली.माझ्याकडे सोन्याचे दागिने आहे,ते विकायचे आहे; असे ती म्हणाली.तिच्यासोबत दुसरे कुणीही नव्हते.त्यामुळे शहजाद आणि बादलच्या लक्षात जे यायचे ते आले.त्यांनी प्रसंगावधान राखत थेट रेल्वे पोलिसांना फोन करून या संशयास्पद घटनाक्रमाची आणि मुलीची माहिती दिली.ते कळताच जीआरपीचे ठाणेदार गौरव गावंडे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले.
त्यांनी महिला पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन सारिकाला ताब्यात घेतले.तिची विचारपूस केली.ती फारशी काही सांगत नसल्याचे पाहून तिच्या बॅगमध्ये असलेल्या डायरीत असलेल्या तिच्या पालकाच्या मोबाइलवर संपर्क केला.ती शुक्रवारपासून गायब असून,गुजरात पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले.सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावंडे यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानुसार,पोलिस अधीक्षक डॉ. प्रियांका नारनवरे यांनी लगेच रेल्वे पोलिस ठाणे गाठून मुलीला विचारपूस केली.चौकशीची औपचारिकता पार पडल्यानंतर सारिकाला मुलींच्या शासकीय वसतिगृहात दाखल करण्यात आले.तिचे पालक नागपुरात आल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे.शहजाद आणि बादलने समजूतदारपणा दाखवला,म्हणून सारिका बचावली.अन्यथा परप्रांतातील एकटी मुलगी सोन्याचे दागिने घेऊन आहे; असे कळताच कुण्याही समाजकंटकाची मती फिरली असती.असे झाले असते,तर मोठा अनर्थ घडला असता.मात्र, शहजाद आणि बादलच्या सदसदविवेकबुद्धीमुळे सारिकाचे भवितव्य सुरक्षित झाले.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

