उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- सध्या नागपूर शहरात इडली,अप्पे, ढोकल्याचा गृहउद्योग जोमात असून प्रत्येक दुकानांत हे खाद्य पदार्थ दिसून येत आहे.परंतु या पाकीटबंद पदार्थात केसही येत असल्याने या गृहउद्योगातील निष्काळजीपणा एखाद्याला भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.एवढेच नव्हे तर एका मोठ्या कंपनीच्या पाकीटबंद कुल्फीतून किडे निघाल्याने दिलेल्या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तो क्रमांकही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे गृहउद्योग व मोठ्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विषबाधा होऊन आरोग्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.अनेक दुकानांमध्ये आता दर्शनी भागामध्येच इडली,अप्पे, ढोकला,कोंब आलेली मोट,चणे,मुंगच नव्हे तर लसून,अद्रकचा पेस्ट आदी पाकीटबंद पदार्थ दिसून येते.हे पदार्थ गृहउद्योगातून तयार केलेले असते.हे पाकीटबंद पदार्थ ताजे असल्याचाही दावा केला जातो.परंतु दक्षिण नागपुरातील एका नागरिकांकडे या पाकीटबंद इडलीतून चक्क केस निघाल्याने या पदार्थाच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.एवढेच विश्वास असलेल्या गृहउद्योगातूनच केस आदी निघत असल्याने भविष्यात या उद्योगाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षात या गृहउद्योगाचा चांगला जम बसला आहे.नागरिकही विश्वास ठेवत पाकीटबंद पदार्थ खरेदी करतात.परंतु आता या उद्योगाच्या विश्वासार्हतेलाच सुरुंग लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.केवळ पैसा कमविण्याच्या नादात या गृहउद्योगांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची प्रचिती इडलीतून केस निघाल्याने आली. गृहउद्योगाकडून अशी चूक होत असताना मोठ्या कंपन्याही मागे नसल्याचे चित्र आहे.
सिव्हिल लाईन्समध्ये मोठी डेअरी असलेल्या एका कंपनीच्या पाकीटबंद कुल्फीमधून चक्क किडे निघाल्यानेही खरेदी करणाऱ्याला धक्का बसला आहे. एवढेच नव्हे आणखी एका आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्य पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीच्या टोस्टला दुर्गंध असल्याचाही या खरेदीदाराला अनुभव आला.त्यामुळे पाकीटबंद पदार्थ आता आरोग्याला धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

