उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली ऑनलाईनचा ट्रेण्ड मोठ्या झपाट्याने सर्वत्र वाढीस लागला आहे.त्यामुळे सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत.सायबर चोरटे नवनवीन शक्कल लढवून अनेक बँक खातेधारकांची फसवणूक करतांना दिसून येत आहेत.कुठली ना कुठली लिंक पाठवून आपला डाटा चोरी करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यामुळे आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.सध्या स्थितीत एसबीआयमधील(स्टेट बँक ऑफ इंडिया)लोकांची खाती हॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.एसबीआयच्या ग्राहकांना मेसेज पाठवून त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात आहेत.याबाबत सरकारने इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली एसबीआय खातेधारकांची फसवणूक होत आहे.लोकांना ईमेल आणि मेसेजद्वारे रिवॉर्ड पॉइंटचे आमिष दाखवून तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या फसव्या मेसेजद्वारे सायबर फसवणूक करून पैसे उकळण्याचा कट सुरू आहे.
एसबीआयने म्हटले आहे की,असे मेसेज चुकीचे आहेत आणि एसबीआय कधीही आपल्या ग्राहकांना एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे कोणतीही लिंक पाठवत नाही.लोकांना बँक आणि सरकारकडून एपीके फाइल डाउनलोड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.लोकांना अत्यंत सतर्क आणि सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

