उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार १० मे रोजी हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलतांना जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडून देशवासीयांना पेट्रोल,डिझेलसह इंधनबचतीचे आवाहन केले.त्याचबरोबर, ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा.पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे,असे सांगतांना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. ‘जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनाकाळात आपण ऑनलाइन बैठका आणि ‘वर्क फ्रॉम होम’ची सवय लावून घेतली होती.आता देशहितासाठी ती पद्धत पुन्हा अंमलात आणण्याची वेळ आली आहे.यामुळे इंधनाचीच बचत होणार नाही,तर देशाचे कोट्यवधींचे परकीय चलनही वाचेल.’ असे त्यांनी स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच सोमवार ११ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शासकीय दौऱ्यांमध्ये काटकसर करणे तसेच चार्टर विमान व मोठ्या वाहनताफ्यांचा वापर मर्यादित करण्याबाबत कळवले आहे.त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, कालच्या आपल्या भाषणामध्ये आपण देशातील नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचे,इंधनाचा वापर कमी करण्याचे, मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले.देशहिताच्या दृष्टीने नागरिकांनी काटकसरीचा अवलंब करावा,हा संदेश निश्चितच महत्त्वाचा आहे.मात्र,त्याचवेळी आपण स्वीडन,नॉर्वे,युएई आणि इटली या देशांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजले.तसेच काल तेलंगणा, बेंगळुरू आणि जामनगर येथील आपल्या दौऱ्यांदरम्यान चार्टर विमानांचा वापर करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रॅली आणि वाहनताफ्यांचे आयोजन करण्यात आले होते. जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्याची बाब आपण अधोरेखित केली आहे.अशा परिस्थितीत इंधन बचतीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवायचा असेल,तर त्याची सुरुवात सरकारकडून होणे आवश्यक आहे.शासकीय दौऱ्यांमध्ये शक्य तिथे काटकसर करणे,चार्टर विमानांचा वापर मर्यादित ठेवणे तसेच वाहनताफे कमी करणे,हा देखील इंधन बचतीसाठी महत्त्वाचा संदेश ठरू शकतो.सामान्य नागरिकांवर काटकसरीचे आवाहन करतांना लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याच तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे,अशी जनतेची अपेक्षा आहे.त्यामुळे आपण स्वतःपासून आणि आपल्या पक्षापासून या उपक्रमाची सुरुवात करावी,असे नाना पटोले यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.त्यामुळे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह इतर लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी याचे पालन करणार काय? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जातो आहे.


