उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-अंतिम मुदत संपूनही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ६० सदस्य अपात्र होण्याच्या मार्गावर आहेत.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात जानेवारी २०२१,ऑक्टोबर २०२२ व डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना ठराविक मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र(कॉष्ट व्हॅलीडीटी)संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.मात्र, ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाला.अशातच निवडून आलेल्या बऱ्याचशा सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केले नसल्याचे आढळून आले.निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात आला.
ज्या व्यक्तीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल आणि ती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचांच्या राखीव जागेवर निवडून आलेली असेल, परंतु शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकास ज्याचा अर्ज पडताळणी समितीसमोर प्रलंबित असेल, अशी व्यक्ती अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करतील, असे स्पष्टपणे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या १० जुलै २०२३ च्या अध्यादेशात नमूद आहे.
ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची संधी १० जुलै २०२४ पर्यंत होती; असे अध्यादेशात नमूद केल्याप्रमाणे तालुका निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांनी १० जुलैपर्यंत वैधता प्रमाणपत्र सादर केलेच नसल्याची माहिती आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतील निवडून आलेले २१ सदस्य,ऑक्टोबर २०२२ च्या निवडणुकीतील सात सदस्य,डिसेंबर २०२२ च्या निवडणुकीतील ३२ सदस्य, अशा एकूण ६० सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याची खात्रीदायक माहिती मिळाली असल्याने ६० सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.

