उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरकारने ‘जल जीवन योजना’ कार्यान्वीत केली आहे.या योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुध्द पाणी मिळावे ही मुळ संकल्पना आहे.परंतु तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जिप क्षेत्रातील मरेगावात या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे.नळजोडणी करूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला आहे.पाणी समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उबाठा) चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी काल, शुक्रवारी ५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर धडक दिली.
१३०० पेक्ष अधिकची लोकसंख्या असलेले मरेगाव हे गडचिरोली तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी १० वर्षापुर्वी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आली होती.गावाचा विस्तार व लोकसंख्या वाढल्याने प्रशासनाने गावात वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली.परंतु सबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे वाढीव पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.मरेगाव येथे आजच्या घडीला गावात ३५० नळजोडण्या करण्यात आल्या आहेत.परंतु काही नागरिकांना अल्प पाणी मिळत आहे; तर काहींच्या नळांना पाणीच येत नाही.त्यामुळे शासनाची ‘जल जीवन मिशन’ योजने अंतर्गत राबवलेले ‘हर घर नल से जल’ ही संकल्पना नाममात्र ठरली आहे.संबंधित विभागाच्या नियोजनशुन्य काराभारामुळे योजनाला हरताळ फासला जात आहे.मरेगाव येथे पाईपलाईन टाकण्याचे काम नियोजनशुन्य आहे. उंच व सखल भाग असे समांतरीतरित्या पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही.काही भागात पाईपलाईन उंच असल्याने नागरिकांच्या नळांपर्यंत पाणीच पोहचत नाही.तसेच पाणीपुरवठ्याचे पाईप कमी व्यासाचे असल्याने पाईपवर प्रेशर येऊन पाईलाईन फुटणे, लिकेज होत आहे. गावात नळयोजना असून पाणी मिळत नसल्याने महिला, नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. याला पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप करीत शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरिवंद कात्रटवार यांनी ग्रामस्थांना घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन गावातील पाण्याची समस्या कथन केली.येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास जिल्हा परिषद समोर ग्रामस्थांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही कात्रटवार यांनी दिला.याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

