उद्रेक न्युज वृत्त :-वन डे वर्ल्ड कप फायनलचा सर्व राग रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर काढताना दिसला.विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितने अचानक गिअर बदलला आणि मिचेल स्टार्कच्या एका षटकात २९ धावा कुटल्या.हिटमॅनची फटकेबाजी पाहून ऑसी गोलंदाज हैराण झाले आणि त्यांचे सर्व डावपेच भारतीय कर्णधाराने नेस्तनाबुत केले.रोहितने १९ चेंडूंत वेगवान अर्धशतक पूर्ण केले आणि टवेंटी-२० वर्ल्ड कपमधील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी नोंदवली.
विराट कोहलीची बॅट आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध शांत राहिली.जोश हेझलवूडने दुसऱ्या षटकार बाऊन्सरवर विराटला फटका खेचण्यास भाग पाडले आणि टीम डेव्हिडने तितकाच अप्रतिम परतीचा झेल घेतला.पण, हिटमॅन रोहित शर्माने मिचेल स्टार्कने टाकलेल्या तिसऱ्या षटकात ६,६,४,६,०,६ अशा २९ धावा कुटून टीम इंडियावरील दडपण टिचकीत कमी केले.मिचेल स्टार्कचे हे आंतरराष्ट्रीय टवेंटी-२० तील सर्वात महागडे षटक ठरले.रोहितने पाचव्या षटकात कमिन्सचेही स्वागत षटकाराने केले,त्याने गुडघ्यावर बसून हा सिक्स स्टेडियमच्या बाहेर पाठवला.पण, पावसामुळे काही काळ सामना थांबला होता.
पुन्हा सुरू झालेल्या सामन्यात रोहितने फटकेबाजी कायम राखली आणि १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या वर्ल्ड कपमधील हे वेगवान अर्धशतक ठरले. भारताकडून टवेंटी-२० तील हे तिसरे वेगवान अर्धशतक ठरले.रोहित व रिषभ पंत यांनी २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.टवेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान अर्धशतकाचा विक्रम रोहितने नावावर करताना युवराज सिंगचा (२० चेंडू) २००७ सालचा विक्रम मोडला.८ व्या षटकात रोहितने मार्कस स्टॉयनिसला टार्गेट करताना ४,६,६ असे फटके खेचले होते.पण, शेवटच्या चेंडूवर रिषभ(१५) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

