उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- गावातील अकुशल मजुरांना गावातच रोजगार मिळावा; यासाठी रोजगाराची हमी असलेला कायदाच तयार करण्यात आला.त्यानुसार यंत्रणा स्तर आणि पंचायत स्तरावरून अकुशलची कामे मोठ्या प्रमाणावर केली जाऊन मजुरांच्या हाताला काम मिळू लागले व काही प्रमाणात उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटू लागला आहे.मात्र,रोजगार मिळाला गावातच,पण मजुरी मिळेना धावतच..! असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे.एक महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी थकली असल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्याच्या घडीला सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेतीचा हंगाम सुरु झाला आहे.शेतीसाठी पैश्याची जुळवाजुळव अनेकांना करावी लागत असते. अशातच१५ दिवसांच्या आत मजुरांना मजुरी मिळावी,असा निकष आहे.मात्र,महिना लोटूनही मजुरी न मिळाल्याने मजुरांना आर्थिक बाब भेडसावत आहे. ग्रामीण भागातील अकुशल कामे करण्याऱ्या मजुरांना १०० दिवसांचा रोजगार रोहयोतून उपलब्ध करुन दिला जातो.रोहयोतून सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरुपाची अकुशल,कुशल कामे मोठ्या प्रमाणात केली जातात.१८ वर्षांवरील नोंदणीकृत मजुरांनी कामाची मागणी केल्याने मजुरांना कामे मिळाली.मात्र,१५ दिवसाच्या आत मजुरांना मजुरी देण्याची तरतूद असताना महिनाभरापासून मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे.१५ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास हजेरीपत्रक बंद केल्याच्या १६ दिवसानंतर प्रतिदिन मजुरीच्या ०.०५ टक्के दराने विलंब आकार(डीले पेमेंट) दिला जातो.अशातच झालेला डीले पेमेंट संबंधितांकडून वसूल करण्यात येतो.मात्र,शासनाकडून रक्कम अदा करण्यात आली नसेल तर असा डीले झालेला पेमेंट कुणाकडून वसूल करणार?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.गडचिरोली जिल्ह्यातील मजुरांची जवळपास १ कोटी १८ लाख ७५ हजार रुपयांची मजुरी थकीत आहे.१५ दिवसांच्या आत मजुरी संबंधित मजुरांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा होणे आवश्यक आहे.मात्र,एक महिना लोटूनही मजुरी मिळाली नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शासनाने लवकरात-लवकर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी अदा करावी; अशी मागणी मजूर वर्गांकडून केली जात आहे.

