- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आई आणि तिची दोन लहान मुले रेल्वे गाडीने जनरल डब्यातून प्रवास करीत होते. प्रवासात मुलांना तहान लागल्याने मुलांची आई बॉटलमध्ये नळाचे पाणी भरण्यासाठी रेल्वे थांब्यावर उतरली.पण,नळावर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने तिला उशीर झाला.तितक्यातच गाडी सुरू झाल्याने गाडीत बसलेले दोन्ही मुले आई म्हणून हाक मारू लागले.तर मुलांची आई रडत-ओरडत गाडीच्या दिशेने धावू लागली.गाडीने वेग घेतला आणि चिमुकल्यांची आई थांबली.मुलांच्या ताटातुटीने ती धाय मोकलून रडत होती.घडलेला सर्व प्रकार पाहून अनेकांना माऊलीची दया आली.त्यातच आरपीएफच्या(रेल्वे संरक्षण दल)सतर्कतेने नागपूर स्थानकावर आई आणि मुलांची पुनर्भेट झाली.
महिला आणि तिची दोन लहान मुले २२५१२ क्रमांकाच्या कामाख्या-मुंबई कर्मभूमी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करीत होते.अश्यातच आज, गुरुवार २२ मे रोजी सकाळी ९.२४ वाजता गाडी गोंदिया स्थानकावर थांबली.मुलांना तहान लागली म्हणून त्यांची आई रेल्वे थांब्यावर (प्लॅटफॉर्म) उतरून पाणी भरायला नळाकडे गेली.मात्र तेथे असलेल्या गर्दीमुळे तिला उशीर झाला आणि गाडी पुढे निघून गेली.ती धावू लागली,पण गाडी निघून गेल्याने महिलेचा आक्रोश पाहून तेथे उपस्थित आरपीएफ जवानांनी लगेच नियंत्रण कक्षाला कळविले आणि ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत नागपूर आरपीएफला कर्मभूमी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात दोन लहान मुले प्रवास करीत आहेत व त्यांची आई गोंदियालाच राहिली असल्याची माहिती देण्यात आली.त्यानुसार हेड कॉन्स्टेबल भानसे व कॉन्स्टेबल धर्मेंद सिंग लगेच ती गाडी येणार असलेल्या प्लॅटफॉर्मवर गेले.दरम्यान,गाडी व्यवस्थापकाला या मुलांबाबत कळताच त्याने या दोघांनाही पँट्री कारमध्ये आणून बसवले होते.नागपूरला गाडी पोहचताच त्यांना आरपीएफकडे सुपूर्द करण्यात आले.त्यानंतर दुसऱ्या गाडीने या मुलांची आई नागपुरात पोहचली.आईला पाहताच दोन्ही मुले तिला बिलगून रडू लागली.त्या मुलांचे आधारकार्ड आणि ओळखपत्र सादर केल्यानंतर चाइल्ड लाइन तसेच साक्षीदारांच्या उपस्थितीत माऊलीला तिचे चिमुकले देण्यात आली. आपली मुले भेटली म्हणून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.
- Advertisement -

