- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आई-वडील गेल्याचे दुःख जगात सर्वात मोठे मानले जाते.मात्र,त्यात स्वतःच्या पोटच्या मुलाला गमवण्याचे दुःख वाट्याला आले तर त्यांची काय अवस्था होते; हे न सांगितलेलेच बरे.दोन चिमुकल्यांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन पंधरा किलोमीटर पायपीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या पत्तीगाव येथे दोन्ही मुलांना जीव गमवावा लागल्याची घटना ४ सप्टेंबरला घडली. बाजीराव रमेश वेलादी वय ६ वर्षे व दिनेश रमेश वेलादी वय साडेतीन वर्षे,दोघेही रा.येर्रागड्डा,ता.अहेरी अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत.
दोन दिवसांपूर्वी आई-वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते.४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला.आई-वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी दिली.त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली.सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला,त्यानंतर दुपारी १२ वाजता दिनेशनेही प्राण सोडले.जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही,त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई-वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली.
दोन्ही भावंडांचे कळेवर घेऊन भाबड्या आशेपोटी हे दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले.तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली; पण वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली.नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते.त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली.त्यानंतर नातेवाइकाची दुचाकी बोलावून त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले.अशातच आता विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात सरकारवर टीका केली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव- वडेट्टीवार👇
‘दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा.हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ.दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात.दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.’
- Advertisement -

