उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :-देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जवळपास ७० ते ८० टक्के लोकसंख्या आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गावखेड्यात वास्तव्याला आहे. गावखेड्यातील बरीचशी जनता ही शेती व मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकण्यात मग्न असतात. अशातच गावखेड्यातील अशिक्षितपणाचा गैरफायदा काही अप्रशिक्षित व्यक्ती पैशाच्या लालसेपोटी घेत आहेत.ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे ढेपाळली असल्याने याचाच फायदा बोगस डॉक्टर घेत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
देसाईगंज शहरात काही प्रमाणात उच्च पदवी घेतलेले आरोग्य चिकित्सकांचे दवाखाने आहेत.तरीही हे डॉक्टर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये चिकित्सेसाठी कमीच पडतांना दिसून येत आहेत.प्रशिक्षित आणि तज्ञ डॉक्टरांकडे एखादे महिने कंपाउंडरगिरी करणारा व खोट्या पदवी घेणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाट गाव खेड्यांमध्ये आहे.या प्रकाराकडे जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे.ग्रामीण भागातील नागरिकांची मिळकत ही तुटपंजी असल्यामळे आणि उद्योग व्यवसायांचा अभाव असल्यामुळे पैशाची नेहमी चणचण भासत असते.या बाबीचा गैरफायदा हे बोगस डॉक्टर नेहमी घेत असतात.काही डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारचे आरोग्यविषयक ज्ञान नसल्यामुळे बऱ्याचदा ग्रामीण भागात जीव हानीसुद्धा होण्याची दाट शक्यता असते. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची आणि जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर चाप बसवण्यासाठी जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

