उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात सतत चार दिवस संततधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित होऊन काहींची घरे पडली तर काहींच्या घरात पाणी शिरून संपूर्ण घर जलमय झाल्याने लोकं चिंतातुर झाले आहेत.अशातच जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून शेतात पऱ्हे टाकले.पऱ्हे टाकून धान रोवणी केली.मात्र,धान रोवणी होताच पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे.शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.त्यामुळे महसूल प्रशासन विभागाने पडझड झालेल्या घरांची तसेच शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी नेते तथा काँग्रेसचे रामदास मसराम यांनी केली आहे.

देसाईगंज तालुक्यासह इतरही तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रामदास मसराम व मित्र परिवार यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची दिनांक-२२ जुलै व २३ जुलै रोजी संपूर्ण तालुक्याच्या गावातील शेतकऱ्यांना भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली.पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व महसूल प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ
शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.मागील वर्षाच्या २०२३ मधील ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे पुरामुळे शेतातील धानपीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.शेतीचे पंचनामे करून याद्याही तयार करण्यात आल्या.मात्र,तालुक्यातील नुकसानीची १ कोटींच्यावर शेतकऱ्यांची रक्कम अजूनही मिळाली नाही.त्यामुळे मागील वर्षी व यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे; अशांना सरसकट त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी रामदास मसराम व मित्र परिवार यांनी केली आहे.

नुकसानीची पाहणी करतांना शेतकरी तथा काँग्रेस नेते रामदास मसराम,माजी देसाईगंज पंचायत समिती सभापती परसराम टिकले,माजी देसाईगंज पंचायत समिती उपसभापती नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,सागर वाढई हितेश तुपट,जावेद शेख,स्वप्नील मिसार,गौरव शिलार व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

