- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून,त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता आवश्यक टूलकिट खरेदीसाठी जास्तीत जास्त १५ हजारापर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.सदरची योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू असून प्रशिक्षित दिव्यांग अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.या योजनेमध्ये प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येत असून निधी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)द्वारे आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यात येणार आहे.निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करण्यात येईल.पात्र लाभार्थ्यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
अनेक दिव्यांग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे की शिवणकाम,मोबाइल दुरुस्ती,संगणक सेवा,ब्यूटी पार्लर, इलेक्ट्रिकल कामे,सुतारकाम,वाहन दुरुस्ती,किरकोळ व्यवसाय इत्यादी सुरू करण्यास इच्छुक असतात; मात्र आवश्यक साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना अडचणी येतात.महाराष्ट्र शासनाच्या विकसित महाराष्ट्र २०४७ या कृती आराखड्यातील दिव्यांग सक्षमीकरणविषयक रोजगार व स्वयंरोजगार या ध्येयाचा एक भाग या पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना कार्यान्वित केली असून याचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा; असे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

