उद्रेक न्युज वृत्त :-लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काही जागांवर अतिशय धक्कादायक निकाल समोर आले होते.लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला होता. दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दोन उमेदवार निवडणुकीत विजयी झाल्याने असामान्य परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता येईल का? ते संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकतील का? असा प्रश्न अनेकांना पडला. कायद्यानुसार त्यांना नवीन सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी नसली तरी त्यांना खासदार म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे.
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांनी पंजाबच्या खदूर साहिब जागेवर विजय मिळवला.तर अभियंता अब्दुल रशीद शेख दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली ९ ऑगस्ट २०१९ पासून तिहार तुरुंगात आहे.अमृतपाल सिंगला एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.त्यांना आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात आले होते. कायदेशीररित्या,अमृतपाल सिंग आणि अब्दुल रशीद शेख यांना १८ व्या लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्यास मनाई आहे; तरीही त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार कायम आहे; त्यानुसार वादग्रस्त खलिस्तान समर्थक नेते आणि खादूर साहिबचे नवनिर्वाचित खासदार अमृतपाल सिंग उद्या ५ जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत.राज्य आणि केंद्रीय यंत्रणांनी मार्ग मोकळा करून त्यांना शपथ घेण्याची परवानगी दिली आहे. पंजाब सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात बंदिस्त असलेल्या अमृतपालला दिब्रुगडहून दिल्लीत आणले जाऊ शकते.उल्लेखनीय आहे की,पंजाब सरकारने काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या संदर्भात निवेदन पाठवले होते.यापूर्वी अलीकडेच, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) तुरुंगात बंद काश्मिरी नेते शेख अब्दुल रशीद यांना २५ जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्याची परवानगी दिली आहे.

