- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील झमकोली गावालगत असलेल्या जंगल परिसरात गुरे चराईसाठी घेऊन जात असलेल्या गुराख्यावर रस्त्यालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकाश विठ्ठल किचक वय ४५ वर्षे,रा.झमकोली, ता.भिवापूर असे जखमी गुराख्याचे नाव असून प्रकाश हे नेहमीप्रमाणे घरची आणि गावातील काही जनावरे जंगल परिसराच्या शिवारात चराईसाठी घेऊन गेले होते. सकाळच्या सुमारास जनावरे घेऊन शेताच्या दिशेने जात असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला.हल्ला चढवताच प्रकाश यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. आवाजाने परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी व मजूर हातात काठ्या घेऊन वाचविण्यासाठी धावले आणि अस्वलाला पिटाळून लावले.हल्ल्यात प्रकाश यांच्या मान,डोके व शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापत झाली.नागरिकांनी त्यांना लगेच उमरेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले.तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.याच शिवारात काही महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता.येथील जखमी अथवा रुग्णांना उपचारासाठी उमरेडला न्यावे लागते.रस्ता खराब असल्याने उमरेडला पोहोचण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो.या काळात जखमी अथवा रुग्ण उपचाराअभावी वाटेत दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे वन विभागाने या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी,अशी मागणी उपसरपंच संजय ढोक यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.
- Advertisement -

