उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात सतत चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नदी,नाले ओसंडून वाहू लागले होते.पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता.रस्ते, रपटे पाण्याखाली येऊन वाहतूक ठप्प झाली होती.संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते.अशातच गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिनांक-२२ जुलै व २३ जुलै रोजी जिल्ह्यातील संपूर्ण शाळेला सार्वजनिक सुट्टी जाहीर केले होती.त्यानुसार आता आज,दिनांक-२४ जुलै रोजी शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत.शाळा पूर्ववत सुरू करण्याअगोदर सर्वप्रथम शालेय इमारत धोकादायक असल्यास अशा इमारती/ खोलीमध्ये कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना बसवू नये,शाळा सुरु करण्यापूर्वी वर्गखोली किंवा शाळा परिसरात शाळेत साप,विंचू इत्यादी विषारी प्राणी नसल्याबाबत खात्री करुनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावे. नैसर्गिक आपत्तीपासून कोणत्याही प्रकारची जीवीत हानी होणार नाही; यादृष्ठीने आवश्यक व्यवस्थापन करण्यासंदर्भात सर्व शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांना सुचित करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग गडचिरोली यांना सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

