- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात यंदा धानाचे विक्रमी उत्पादन झाले असून,सध्या मंजूर असलेल्या लक्षांकापेक्षा अधिक धान विक्रीसाठी उपलब्ध आहे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना आधारभूत किंमतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याला दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.मात्र,अजून पावेतो केंद्र सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने “यंदा धान झाले खरी; पण पडून आहेत घरी” अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी २०२५-२६ च्या हंगामाकरिता १०.४५ लाख मेट्रिक टन धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते.त्यापैकी आतापर्यंत सुमारे ८.२० लाख मेट्रिक टन धान खरेदी पूर्ण झाली आहे,जे एकूण लक्षांकाच्या जवळपास ७८.५० टक्के आहे.अनुकूल हवामान आणि लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने यंदा विविध ठिकाणी धानाचे मोठे उत्पादन झाले आहे.सध्या केंद्राने दिलेले उद्दिष्ट संपत आले असले तरी, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी अद्याप मोठ्या प्रमाणात धान शिल्लक आहे.३१ मार्च २०२६ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून,उर्वरित काळात राज्यात अतिरिक्त १० लाख मेट्रिक टन धान आवक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अश्यातच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या धानाची खरेदी वेळेत न झाल्यास त्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे.ही पिळवणूक थांबवण्यासाठी राज्याला अतिरिक्त धान खरेदीचे उद्दिष्ट त्वरित वाढवून देणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता, त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळावे,यासाठी केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्राचे धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे,अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
- Advertisement -

