उद्रेक न्युज वृत्त
औरंगाबाद :- समाज माध्यमावर होणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे.अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओेक यांनी दिलेल्या पत्रात दिली आहे.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्च पासून घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे आयोजन कॉपीमुक्त वातारवणात होण्यासाठी राज्य मंडळाच्या वतीने शुक्रवारी बैठक घेण्यात आली.यावेळी ही माहिती ओक यांनी दिली.दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक आणि समाज घटक या परीक्षांकडे लक्ष देवून असतात.विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाच सहा वर्षापासूनदेण्यात येत होती. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे प्रकार, अफवा अशा घटनाही परीक्षेच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थींचे नुकसान होते, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पेपरफुटीच्या घटनांना आळा बसावा, परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे असे ओक यांनी म्हटले आहे.कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांशिवाय बैठे पथके, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिकक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयातूनही भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहेत