- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दुचाकीने एका विवाह समारंभासाठी निघालेल्या पती आणि पत्नी समोरच भलामोठा पट्टेदार वाघ थेट त्यांच्या जवळच येऊन थांबला.भीतीने दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला.अश्यातच दोघांनी कुठलीही हालचाल वा आरडाओरड न करता शांत राहिल्याने मोठा अनर्थ टळून सुदैवाने वाघाने हल्ला न चढवता थोड्याच वेळात दिशा बदलली आणि शांतपणे जंगलात निघून गेला.वाघ नजरेआड होताच दाम्पत्याने सुटकेचा निःश्वास सोडला.सदरची चित्तथरारक घटना नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील चन्ना ते वेलतूर मार्गावर काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
सायंकाळचे सुमारे साडे पाच वाजले होते.कुही तालुक्यातील चन्ना ते वेलतूर जंगलमार्ग शांत होता. झाडांच्या सावल्या रस्त्यावर पसरल्या होत्या.शिक्षक नितीन खोब्रागडे पत्नीसह दुचाकीने लग्नसमारंभासाठी वेलतूरकडे निघाले होते.जंगलाच्या मधोमध रस्त्याच्या कडेला बसलेला वाघ त्यांच्या नजरेस पडला आणि बोबडी वळली.समोर वाघ आणि आजूबाजूला घनदाट जंगल,काय करावे? हेच त्यांना सुचेनासे झाले.नितीन यांनी घाईघाईने दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र, गोंधळात गाडीचा तोल गेला आणि पत्नी रस्त्यावर पडल्या.पडल्याचा आवाज होताच वाघ सावकाश त्यांच्या दिशेने चालू लागला.तो क्षण अंगावर काटा आणणारा होता.काही अंतरावर उभा असलेला वाघ थेट त्यांच्या जवळ येऊन थांबला.भीतीने दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला होता. आरडाओरडा केला असता परिस्थिती आणखी बिघडू शकते,याची जाणीव असल्याने त्यांनी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.काही क्षण वाघ त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला.काही सेकंद जणू काळ थांबला होता.सुदैवाने वाघाने कोणताही हल्ला केला नाही.थोड्याच वेळात त्याने दिशा बदलली आणि शांतपणे जंगलात निघून गेला.वाघ नजरेआड होताच पत्नी रस्त्यावर पडल्याने त्या जखमी झाल्याने नंतर एका नागरिकाच्या मदतीने त्यांना वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले खरी,पण घडलेल्या प्रसंगाने बराच वेळ दाम्पत्त्यात धडकी भरली होती.
- Advertisement -

