- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय गुन्ह्याचे स्वरूप बघता पोलीस कोठडी वा न्यायालयीन कोठडी सुनावत असते.चोवीस तासांच्या आत न्यायालयात हजर न केल्यास कितीही मोठा गुन्हेगार असो,त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होते.त्यामुळे केलेली अटक ही अवैध ठरते आणि तसेच झाले गडचिरोली शहरातील हत्या प्रकरणात.प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर यांनी पोलिसांनी केलेली अटक अवैध ठरवून हत्या प्रकरणातील आरोपीस विविध अटींसह जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या नवेगाव येथे रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त महिला अधिकारी कल्पना उंदिरवाडे यांची डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून हत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती.कल्पना उंदिरवाडे या आपल्या मुलासोबत नवेगाव येथील सुयोगनगर येथे राहत होत्या.त्यांच्यासोबत घरकाम करणाऱ्या शांताबाई अंबादास मुळे वय ६०,रा.नवेगाव यासुद्धा राहत होत्या.उंदिरवाडे यांचे राहते घर दुमजली असून,खाली व वरच्या मजल्यावर तीन कौटुंबिक खोल्या आहेत.सर्वात वरच्या मजल्यावर तीन सिंगल रूम असून, त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुली राहत होत्या.सर्वच खोल्या किरायाने दिल्या होत्या.अशातच तीन कौटुंबिक खोल्यांपैकी एका खोलीत आरोपी विशाल ईश्वर वाळके वय ४० वर्षे,रा.ता.एटापल्ली,जि.गडचिरोली त्याची पत्नी व आई किरायाने होते.अशातच विशाल वाळके याच्यावर कर्ज व हात उसनवारी घेतलेले इतरांचे पैसे देणे होते. त्यामुळे त्याने १३ एप्रिल रोजी कल्पना उंदीरवाडे यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.चोरी करतांना आरोपी सापडला असता,त्याने कल्पना यांचे डोक्यावर रॉडने प्रहार केला.त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.कल्पना उंदीरवाडे यांचा मृत्यू होताच आरोपी विशाल वाळके याने कल्पना यांच्या अंगावरील तीन दागिने घेऊन पसार झाला होता.हत्येचे गूढ पाच दिवस उलटूनही कायम होते. पोलिस उपनिरीक्षक असलेल्या त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर दुसऱ्या दिवशी १४ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा नोंद झाला; पण,हत्या कोणी व कशासाठी केली? हे प्रश्न अनुत्तरित असतांनाच महिलेची हत्या करणाऱ्या आरोपी विशाल ईश्वर वाळके याला गडचिरोली पोलिसांनी १७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी बारा वाजता पुणे येथून ताब्यात घेतले होते.त्यानंतर त्यांनी वाळकेला १८ एप्रिल रोजी सकाळी ८:३५ वाजता अटक दाखवून सायंकाळी ५ वाजता प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर केले.त्यामुळे,वाळकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून पोलिसांची ही कृती अवैध असल्याचा दावा केला होता.न्यायालयाने वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार,भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील तरतूद आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय विचारात घेता हा दावा योग्य ठरवून गडचिरोली पोलिसांना फटकारले. वाळकेला गडचिरोलीतील न्याय दंडाधिकारी न्यायालयात चोवीस तासांत हजर करणे शक्य नव्हते, तर त्याला इतर कोणत्याही नजीकच्या न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर करून पीसीआर(पोलीस कोठडी)मागायला पाहिजे होता.परंतु,पोलिसांनी ज्या दिवशी पकडले त्या दिवशीची नोंद न करता विलंबाने अटक दाखवण्याचा अवैध मार्ग अवलंबला.परिणामी,वाळकेची अटक अवैध ठरते,असे न्यायालयाने सांगून त्याला विविध अटींसह जामीन मंजूर केला आहे.पोलिसांच्या एका चुकीमुळे हत्या प्रकरणातील आरोपीस जामीन मिळाल्याने कायदा व न्याय हा सर्वांसाठी समान असतो,हे यावरून स्पष्ट होत आहे.
- Advertisement -

