उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणातून २८ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील रोपीनगट्टा गावात उघडकीस आली आहे.यामध्ये पाच चिमुकल्यांचा समावेश असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यातआले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपीनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातीच्या नामकरण विधीचा कार्यक्रम ४ जुलैला आयोजित केला होता.यानिमित्ताने टेकाम परिवाराने खास मांसाहारी जेवणाचा बेत आखला होता.
मात्र,पहिल्या पंगतीत जेवण केलेल्यांना १५ मिनिटांतच उलट्या,मळमळ,डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली.त्यानंतर एकच गोंधळ उडाला, दुसरी पंगत थांबविण्यात आली.प्रकृती अत्यवस्थ झालेल्या सर्व १८ जणांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तेथे प्रथमोपचार केल्यानंतर २२ जणांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सहा जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले आहे.यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

