उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- केंद्र शासनाच्या Eat Right India या उपक्रमाअंतर्गत Eat Right Challenge-२ ही स्पर्धा अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मार्फत २०२२-२३ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत देशभरातील जिल्ह्यांनी भाग घेतलेला होता.यात उत्कृष्ठ काम करणाऱ्या देशभरातील २६० जिल्ह्यांची निवड करण्यात येणार होती.
सदर स्पर्धेत प्रामुख्याने अन्न परवाने व नोंदणी यांची संख्या वाढविणे,तक्रारीचा निपटारा करणे,जनजागृती करणे,अन्न नमुने विश्लेषणासाठी घेणे,सर्व्हेक्षण नमुने घेणे व इतर विशेष कामकाजाचे मुल्यांकन करुन गुण देण्यात आले होते.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन गडचिरोली जिल्ह्याने संपुर्ण महाराष्ट्रात १६ वा क्रमांक पटकाविला आहे.उल्लेखनिय बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनात मनुष्यबळाची कमतरता आहे.तसेच बिकट भौगोलिक परिस्थिती असलेल्या या जिल्ह्यात एकच अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून त्यांनी २ अतिरीक्त पदाचा अतिरीक्त कार्यभार सांभाळुन सर्व अडचणींवर मात करुन राज्यात १६ वा क्रमांक व संपुर्ण देशात १२० वा क्रमांक पटकाविला आहे.गडचिरोली जिल्ह्यात सदर स्पर्धेअंतर्गत दैनदिन अंमलबजावणी कामकाज तसेच अन्न परवाना व नोंदणी घेण्याकरीता विशेष कॅम्पचे आयोजन केले.या कालावधीत सुमारे ६४ सर्वेक्षण नमुने घेऊन अन्न व्यावसायीकांना FOSTAC प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित केले.त्याचप्रमाणे आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून प्रभात फेरी तसेच विविध शाळेत जाऊन मुलांना पौष्टीक आहार संबंधी माहिती देणे व जंकफूडच्या दुष्परिणामावर मार्गदर्शन करणे,तंबाखु मुक्तीबाबत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.तसेच High Risk असणारे अन्न नमुने काढले.तसेच विविध खाद्यव्यसायीकांच्या बैठका घेऊन त्यांना कायद्याबाबतची माहिती सुद्धा देण्यात आली होती.या सर्व उपक्रमांचे अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण,नवी दिल्ली यांनी मुल्यांकन करुन गडचिरोली जिल्ह्याला बहुमान दिला.सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरीता नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त अभय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांनी विशेष परिश्रम घेतले.असे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन,(म.रा.)गडचिरोली यांनी कळविले आहे.